Sharad Pawar on Raj Thackeray : फोन आला पण भेटीबाबत ठरलं नाही- शरद पवार
Sharad Pawar, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला आहे. स्वत: शरद पवार (Sharad Pawar) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज ठाकरे यांचा फोन आला होता. बोलणं झालं मात्र भेटीबाबत काही ठरलं नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलं आणि राज्यातील दूध दरांच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांना फोन केल्याची माहिती आहे. टीव्ही नाईनने याबाबतचे वृत्त दिले आहे.

राज ठाकरे यांनी नुकतीच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांच्यासोबत या विषयावर चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार का? याबाबत उत्सुकता आहे.

राज्यपालांशी झालेल्या भेटीबाबत राज ठाकरे यांनी माहिती देताना काल (29 ऑक्टोबर) सांगितले की, 'राज्यातील नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीजबिलासंदर्भात ही भेट होती. ही प्राथमिक स्वरुपातील भेट होती. या भेटीत केवळ वाढीव वीजबिरासंदर्भातच चर्चा झाली' हे त्यांनी आवर्जून सांगितले.'

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यपालांनी वाढीव वीज बिलासंदर्भात शरद पवार यांच्याशी बोलण्यास सांगितले. त्यामुळे मी शरद पवार यांच्याशी प्रत्यक्ष अथवा फोनवर बोलणार आहे. त्यासोबतच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे. राज्यात अनेक अनेक प्रश्न आहेत. परंतू त्यावर योग्य पद्धतीने विचार होऊन निर्णय व्हायला पाहिजे, असे राज ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Raj Thackeray meet Governor Bhagat Singh Koshyari: 'शरद पवार यांना भेटा' राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना सूचवले)

दरम्यान, राज्य सरकार नेमके निर्णय घेत नाही. अनेक गोष्टींमध्ये धरसोड करत आहे. असे कुंथत कुंथत सरकार चालत नाही. काय तो ठाम निर्णय घ्यायला पाहिजे असे राज ठाकरे या वेळी म्हणाले. तसेच, सरकारने मंदिरे, शाळा आणि इतर गोष्टी कधी उघडणार आहात याबाबत स्पष्ट काय ते एकदा राज्याच्या जनतेला सांगायला हवे असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.