Schools & Colleges Reopen in Pune: पंधरा ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळेतच लसीकरण, पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु- अजित पवार
Schools | Representational Image (Photo Credits: Pixabay)

विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती केली जाणार नाही. ज्या पालकांची संमती असेल त्याच विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास संमती असेल. तसेच 1 फेब्रुवारीपासून पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये (Schools & Colleges Reopen in Pune) सुरु होतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी दिली आहे. अजित पवार यांनी आज पुणे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.राज्य सरकारने 23 जानेवारीपासून राज्यभरातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा सोमवारपासून सुरु झाल्या होत्या. मात्र, पुण्यातील शाळा मात्र अद्यापर्यंत बंद होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

राज्य सरकारने 23 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याबाबत परवानगी दिली असली तरी, त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार अंमलबजावणी करत अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या. मात्र, पुणे जिल्ह्यात मात्र स्थानिक प्रशासनाने शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले होते. दरम्यान, आता आढावा बैठक पार पडल्यानंतर शाळा सुरु करण्याबाबत निर्णय झाला आहे. (हेही वाचा, 7 वी पर्यतच्या शाळांमधील वर्ग आता 12 वी पर्यंत वाढणार; मंत्री वर्षा गायकवाड यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश)

अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शाळा सुरु झाल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधणकारक असणार नाही. पाल्यांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांची संमती घेणे आवश्यक असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोणावरही मुलांना शाळेत पाठविण्याबाबत जबरदस्ती करण्यात येणार नाही. हळूहळू घडी निट बसत आहे. एकदा का ही घडी निट बसली की मग पुढील निर्णय घेतला जाईल. सुरुवातीचे काही काळ पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या शाळा अर्धा दिवसच असतील. दुपारच्या सुटीनंतर मुलांनी डबा घरी जाऊन खायचा आहे, असेही ते म्हणाले. इयत्ता नववी पासून पुढचे वर्ग मात्र पूर्णवेळ असतील असे अजित पवार म्हणाले.