
सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. सांगली (Sangli) जिल्हा कारागृहातून आतापर्यंत 80 कैदी कोल्हापूर मधील कळंबा जेल मध्ये हलवले आहे. सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. यामध्ये 20 महिला कैदी आणि 60 पुरुष कैदी यांचा समावेश आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना हलवले जाणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. याशिवाय कारागृहातील अन्न धान्य , कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे. सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (हेही वाचा - Raigad: अलिबाग किनाऱ्यावर वाहून गेली टगबोट; तटरक्षक दलाकडून 14 क्रू मेंबर्सची यशस्वीरित्या सुटका)
दरम्यान, पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने महापुराची भीती वाढली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाण्यची पातळी 43 फूट 2 इंचांवर पोहोचली आहे. राधानगरी धरण सुद्धा 100 टक्के भरलं असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार तसेच एच. के. पाटील यांची भेट घेतली.
सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे सज्ज आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यास आवश्क तो अन्नधान्यसाठा, आणि इतर वस्तुंचा साठा करून ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कारागृहातील संगणक कक्ष, कागदपत्रे सर्व गोष्टी पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.