प्रेम प्रकरणातून दोन जणांना अमानुष मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना पुण्यातील चाकण परिसरातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. यात मृत व्यक्तीच्या पत्नीचाही समावेश आहे. मृत व्यक्तीचे त्याच्या मालकाच्या मुलीसोबत प्रेम संबध जुळले. त्यानंतर प्रेयकराच्या एका मित्राने त्यांना पळून जाण्यास मदत केली. याच रागातून नातेवाईकांनी प्रियकरासह त्याच्या मित्रालाही जबर मारहाण केली. ज्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. यात प्रेयसीही जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळू सीताराम गावडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बाळू हा विवाहित असून तेथील वीटभट्टी मालकाकडे कामाला होता. दरम्यान, त्याचे आणि मालकाच्या 21 वर्षीय मुलीसोबत प्रेम जुळले. याची माहिती बाळूचा मित्र राहुलला होती. याच दरम्यान, बाळू आणि मालकाच्या मुलीने 15 जुलै रोजी पळून जाण्याचा निर्णय घेतला. यात राहुल बाळूची मदत करत होता. स्वतः राहुलने या दोघांना खोपोली परिसरात दुचाकीवरून सोडले होते. परंतु, बाळू आणि मुलगी बेपत्ता असल्याने वीटभट्टी मालकाचा संशय बळावला आणि त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने दोघांचा शोध सुरू केला. यावेळी राहुलही त्यांच्यासोबत दोघांना शोधण्याचे नाटक करत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (16 जुलै) दोघांना शोधण्यात यश आले. या दोघांना आरोपींनी त्यांच्या हॉटेल माणुसकी येथे घेऊन गेले. तेव्हा राहुलचे पितळ उघडे पडले. ज्यानंतर बाळू, राहुल यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली. यात या दोघांचाही मृत्यू झाला. तसेच प्रेयसीही यात जखमी झाल्याचे वृत आहे. हे देखील वाचा- अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या 8 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या; भिवंडी येथील घटना
या घटनेनंतर प्रेयसीच्या वडिलांनी चाकल पोलिसांना फोनवरून हॉटेलमध्ये दोन जणांचे मृतदेह पडल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. पंरतु, मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना वेगळाच संशय आला. त्यांनी प्रेयसीच्या वडिलांची उलट चौकशी केली. ज्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. यात बाळूच्या पत्नीचाही समावेश आहे.