Onion Farming

नागपूरमधील धापेवाडा येथील भक्ती फार्ममध्ये नितीन गडकरी यांच्या पत्नी श्रीमती कांचन यांनी एक अनोखा प्रयोग केला आहे. या ठिकाणी त्यांनी मल्चिंग पेपर तंत्राचा वापर करून सेंद्रिय कांद्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. महत्वाचे म्हणजे या कांद्यांचे वजन प्रती कांदा साधारण 1 किलो इतके आहे. नितीन गडकरी यांनी एका व्हिडीओद्वारे या कड्यांच्या उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

या प्रयोगाला सुरुवात झाली ते खास प्रकारच्या बियांपासून. सेमिनीस कंपनीच्या या बिया नेदरलँडहून आणण्यात आल्या होत्या. या साधारण अडीच किलो बिया 1 एकर जमिनीत पेरण्यात आल्या. सुरुवातीच्या 45 दिवसांमध्ये नर्सरी तयार करण्यात आली. या ठिकाणी छोट्या रोपांची व्यवस्थित काळजी घेण्यात आली. त्यानंतर ही वाढलेली रोपे दुसरीकडे लावण्यात आली. त्या ठिकाणी डबल ड्रिप इरिगेशन सिस्टीम बसवण्यात आली व इथल्या मातीत बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर करण्यात आले.

त्यानंतर त्यावर मल्चिंग पेपर टाकण्यात आला व होल पाडून तिथे रोपे लावण्यात आली. मल्चिंग पेपर हा मातीला झाकण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिकचा किंवा इतर नैसर्गिक (बायोडिग्रेडेबल) साहित्याचा पेपर असतो. याचा एक भाग सिल्व्हर तर दुसरा भाग काळ्या रंगाचा असतो. हा पेपर मातीचे तापमान नियंत्रित ठेवतो, तणांची वाढ रोखतो, आणि पाण्याची बचत करतो. मल्चिंग पेपरमुळे मातीतील सेंद्रिय पदार्थ वाढतात, ज्यामुळे मातीची सुपीकता वाढते. मल्चिंग पेपरमुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढते. (हेही वाचा: Monsoon Forecast 2025: जून महिन्यात 108% पाऊस, खरीप पिके आणि कृषी क्षेत्रास दिलासा; हवामान अंदाज वर्तवताना IMD चे भाकीत)

या मल्चिंग पेपरवर साधारण 24 हजार कांद्याची रोपे लावण्यात आली. या सर्वांना ड्रिप इरिगेशन सिस्टीमद्वारे पोषक घटक पुरवण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेमध्ये 7 ते 10 टक्के मृत्युदर राहिला, जो शेतीच्या मानकांच्या प्रमाणात खूपच कमी होता. इतर पिकांनी खूप चांगले उत्पादन दिले. यातील तयार कांद्याचे वजन हे 400-800 ग्रॅम होते. एकूण उत्पादनाबद्दल बोलायचे तर, 1 एकरमध्ये 12-13 टन उत्पादन झाले. जर अशाप्रकारे जर कोणी शेतकरी सेंद्रीय शेती करणार असेल तर आम्ही त्याला पूर्ण सहकार्य आणि मदत करू, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

Onion Farming:

दरम्यान, भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात कांद्याची लागवड केली जाते. इतर राज्यांमध्ये, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि बिहारमध्येही तो पिकवला जातो. अहवालानुसार, कांद्याच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 27.72% आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा हे महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हे आहेत.