नवी मुंबई: वाशी येथील विवाहसोहळ्यात Coronavirus पासून खबरदारी म्हणून  मास्क, सॅनिटायझरचे वाटप
Wedding Ceremony with masks (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वच स्तरातून खबरदारी घेतली जात आहे. सरकारच्या प्रयत्नांना नागरिकही साथ देत असल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) मधील वाशी (Vashi) येथे काल (गुरुवार, 19 मार्च) पार पडलेल्या लग्नसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप करण्यात आले. या लग्नसोहळ्याला साधारणपणे 50 लोक उपस्थित होते. तसंच पाहुण्यांसाठी खास पॅकेज फूडची सोय करण्यात आली होती.

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता यापूर्वीच सरकारने लग्नसोहळे काही काळासाठी पुढे ढकलण्याचे किंवा रद्द करण्याचे आवाहन केले होते. इतकंच नाही तर अशा प्रकारच्या सोहळ्यांना कमीत कमी पाहुणे बोलवा, असेही सांगण्यात आले होते. सरकारच्या याच आवाहनचे पालन करत या जोडप्याने अधिक दक्षता घेतली. त्यांनी दाखवलेली ही जागरुकता खरंच स्तुत्य आहे. (Coronavirus Outbreak: मास्क वापरून COVID 19 चा धोका टाळता येऊ शकतो का? जाणून घ्या या '8' टीप्स)

ANI Tweet:

देशातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे रविवार, 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले आहे. त्यादिवशी सकाळी 7 ते रात्री 9 या काळात कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे. तर महाराष्ट्र राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केले आहे.