Governor BS Koshyari On Mumbai: गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य
Bhagat Singh Koshyari | (Photo Credit : ANI)

महाराष्ट्रातून खास करुन मुंबई (Mumbai) आणि ठाणे येथून गुजराती आणि राजस्थानी लोकांना हटवले तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही. तुम्ही मुंबई आर्थिक राजधानी म्हणता पण गुजराती आणि राजस्थानी लोक नसतील मुंबई ही आर्थिक राजधानीच राहणार नाही, असे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काढले आहेत. मुंबई येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यपाल कोश्यारी यांची वादग्रस्त विधाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही राज्यपालांच्या विधानावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. राज्यपालांनी क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्याबाबत काढलेले उद्गारही असेच वादग्रस्त ठरले होते. राज्यपालांनी काढलेल्या उद्गारावरुनही आता वाद निर्माण होण्याची अधिक चिन्हे आहेत. (हेही वाचा, Sanjay Raut on Maharashtra Government: राज्यात सरकार नाही.. महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये.. राज्यपाल आता कुठे आहेत? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल)

ट्विट

दरम्यान, राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत होते तेव्हाही राज्यपालांची भूमिका आणि वर्तन यावरुन टीका झाली होती. राज्यपाल राज्य सरकारला सूचना देण्याऐवजी स्वत:च राज्यभर दौरे काढून राज्यातील स्थितिचा आढावा घेत होते. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात झालेला पत्रोत्तरावरुनही वाद रंगले होते. सत्ताधारी आणि विरोधकांच्या सत्तासंघर्षातही राज्यपालांची भूमिका अनेकदा चर्चेची ठरली आहे.