मुंबई: संततधार पावसामुळे मध्य रेल्वे सेवा विस्कळीत, हिंदमाता, सायन परिसरात सखल भागात साचले पाणी
Rainfall in Mumbai City | (Photo Credit: ANI)

Rainfall in Mumbai City And Suburban: मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरांमध्ये गणपती आगनापासून सुरु झालेला पाऊस आता चांगलाच स्थिरावला आहे. प्रामुख्याने मंगळवार (04 सप्टेंबर 2019) दुपारपासून पासून सुरु झालेली पावसाची संततधार बुधवारी सकाळीही सुरुच राहिली आहे. त्यामुळे मुंबई शहरांसह उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, मुंबईची नस म्हणून ओळखल्या जणाऱ्या रेल्वे सेवेवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे लाईन सुरळीत सुरु असली तरी, मध्य रेल्वे (Central Railway Mumbai) वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरुन अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

मुंबईमध्ये हिंदमाता थिएटर परिसर, सायन आदी परिसरात सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेखाली पाच ते सात फूट पाणी साचले आहे. तर, अंधेरी, मालाड, बोरिवली आदी ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. येथील लिंक रोड परिसरातील सखल भागातही चांगलेच पाणी साचले आहे. त्यामुळे रस्तेवाहतूकही विस्कळीत झाली असून, नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. (हेही वाचा, Mumbai Rain: मुंबईत सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर)

दरम्यान नवी मुंबई परिसरातही पावसाची संततधार कायम आहे. ऐरोली, जुईनगर, वाशी, पनवेल, नेरुळ, खारघर, कामोठे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. तर, ठाणे जिल्ह्यातही ठाणे, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.

एएनआय ट्विट

नागरिकांना सतर्कतेचा इशारा, शाळांना सुट्ट्या

पावसाची संततधार कोसळत असल्यामुळे शासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, संभाव्य धोक्याची शक्यता विचारात घेऊन सावधानता म्हणून शाळांना सुट्टी दिली आहे. तसेच, नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देताना कामाशिवाय घराबाहेर पडून नका. जर अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे म्हटले आहे.