BJP चा महाराष्ट्र गृह खात्यावर पक्षपातीपणाचा आरोप, मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेणार; राष्ट्रपती राजवटीची आमची मागणी नाही - आशिष शेलार
BJP | Twitter

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून भाजपा (BJP) विरूद्ध शिवसेना (Shiv Sena) हा संघर्ष अनेकदा तीव्र होत असल्याचं चित्र आहे. आज भाजपाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र, मुंबई मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असल्याचं, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच  कायदा हातात घेत असल्याचा म्हटलं आहे. यावेळी भाजपाने राज्यात अराजकतेची स्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्राचे गृहखाते पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची आमची मागणी नसल्याचं आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बोलून दाखवलं आहे. मात्र कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने मागील काही घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि योग्य कारवाईसाठी आम्ही आज मुंबई पोलिस आयुक्तांची (Mumbai Police Commissioner)  भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान मुंबई मध्ये भाजपा कडून बीएमसीच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवण्यासाठी सुरू झालेली पोलखोल मोहिम शिवसेनेच्या निशाण्यावर असल्याचं सांगत त्यांच्याकडून तोडफोड झाल्याचाही आरोप भाजपा ने केला आहे. काल मुंबईत मनोज कंबोज यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाल्याचं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. तर आशिष शेलारांनी शिवसेनेला ठोकशाहीचं उत्तर ठोकशाहीने मिळेल असं म्हटलं आहे. मनोज कंबोज यांच्यावरील हल्ला हा मॉब लिंचिंगचा प्रकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  Mohit Kamboj Car Attack: भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला, भाजप आक्रमक .

धनंजय मुंडे यांच्यावर पीडीतेने केलेल्या आरोपांनंतर एक न्याय आणि गणेश नाईकांना दुसरा न्याय असं म्हणत गृहखात्यावर पक्षपातीपणाचे आरोप केले आहेत. राणांनी हनुमान चालिसेचं पठण करण्याला विरोध का? असा प्रश्नदेखील पुन्हा भाजपा कडून विचारलं आहे.

आज शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मीडीयाशी बोलताना राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या आम्हांला देऊ नका असे म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी ट्वीट करत 'Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी.' असं सूचक ट्वीट देखील केले होते.