
महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर यांच्या घाट क्षेत्रांना भारतीय हवामान खात्याने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 48 तासांत या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. यामुळे स्थानिक पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. या हवामान अंदाजामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क झाली असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात पुढील 24 तासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज 25 जून 2025 रोजी सायंकाळी 5:30 पासून रात्रौ 8:30 वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे 3.5 ते 4.1 मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला होता. नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू सातारा जिल्ह्यात वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून, धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दिनांक 24 जून 2025 रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून 30,513 क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्हयात पाटपन्हाळा, ता. राधानगरी येथे डोंगर उतारावरील माती सरकण्यास सुरवात झाल्यामुळे, खबरदारी म्हणून डोंगरापासून 200 मीटर अंतरावर असणाऱ्या शाळेतील सर्व वर्ग सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. गाव डोंगरापासून 2 किमी अंतरावर असून कोणताही धोका नाही. पनोरी ते फराळे कारखाना रोड वाहतूक सुरू कोल्हापूर जिल्हयात राधानगरी तालुक्यातील पनोरी ते फराळे कारखाना रोडवर दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रिकामा केला असून वाहतुक सुरळीत चालू आहे. (हेही वाचा: Mumbai High Tide Warning: मुंबईकरांनो सावधान! BMC ने दिला 24 ते 28 जून दरम्यान सलग पाच दिवस मोठ्या भरतीचा इशारा; लाटांची उंची 4.75 मीटरपेक्षा जास्त)
तीव्र पावसामुळे कोकण आणि घाट क्षेत्रांमध्ये अनेक धोके निर्माण झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घाट क्षेत्रांमध्ये वाहनचालकांना कमी दृश्यमानता आणि भूस्खलनाच्या जोखमीबाबत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुणे, रायगड, आणि पालघर जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) पथके तैनात आहेत. कोकण किनारपट्टीवर उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे, आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.