Maharashtra Political Crisis: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात
Shiv Sena in the Supreme Court |

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पुढच्या 24 तासात बहुमत सिद्ध करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारला पत्र दिले आहे. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेना (Shiv Sena) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) पोहोचली आहे. शिवसेना प्रदोत सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी राज्यापालांच्या आदेशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याचे समजते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे.

शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू सकाळी 10.30 वाजता न्यायालयात याचिका दाखल करतील. सर्वोच्च न्यायालयाच्या व्हेकेशन बेंचसमोर ही याचिका दाखल केली जाईल. जेष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने बाजू न्यायालयात मांडणार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: शिवसेना बंडखोरांना साद, राज्यपालांना टोला; बहुमत चाचणीच्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया)

शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी दिलेल्या पत्रावरुन विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटातील 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आगोदरच दाखल झाले आहे. या प्रकरणावर निलंबित आमदारांना बाजू माडण्यासाठी न्यायालयाने 21 जुलै पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला, अथवा बहुमताची चाचणी करण्याबाबत राज्यपालांनी आदेश आले तर काय करायचे? असा सवाल त्याच वेळी न्यायालयात उपस्थित करण्यात आला होता. मात्र, आम्ही जर तरच्या बाबींवर आताच बोलणार नाही. तसे काही घडले तर तुम्ही आमच्याकडे या असे शिवसेनेला सांगण्यात आले होते. त्यामुळे संबंधित प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे.

दरम्यान, भाजपकडून देशात संविधानाचे धिंडवडे उडविण्याचे काम सुरु आहे. प्रकरण कोर्टात प्रलंबीत असतानाही बहुमत चाचणीचे आदेश सरकारला देण्यात आले आहेत. आम्ही या विरोधात कोर्टात जाऊ. आमचा न्यायालयावर आजही विश्वास आहे, असी भूमिका शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळीच व्यक्त केली होती. राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीली महाविकासआघाडी सरकारला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येत्या 24 तासात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.