मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित प्रतिमा)

Maharashtra Monsoon Session 2019: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे विधिमंडळ अधिवेशनासाठी विधिमंडळ आवारात आगमन होताच 'आले रे आले.. चोरटे आले..' असे म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 'आयाराम गयाराम जय श्रीराम'

दरम्यान, विरोधी पक्षनेता राहिलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दलही विरोधकांच्या मनात असलेली प्रचंड खदखद आज पाहायला मिळाली. सकाळपासून विरोधकांनी विरोधक 'आयाराम गयाराम जय श्रीराम' अशी घोषणाबाजी करताना दिसत होते. यासोबतच 'पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो' अशाही घोषणा विरोधकांनी दिल्या.

राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

महाराष्ट्र राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन आजपासून राजधानी मुंबई येथे आजपासून सुरु होत आहे. राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या सत्ताकाळातील हे शेवटचेच अधिवेशन आहे. कारण यानंतर थेट विधानसभा निवडणुकाच लागणार आहेत. त्यामुळे आपल्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचत राज्य सरकार आपले प्रगती पुस्तक मांडण्याची शक्यत आहे. तर, विविध विधेयके पास करत जनतेलाही दिलासा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या कारभारात राहिलेल्या त्रुटींवर विरोधक कसा प्रहार करतात हा देखील या अधिवेशनातील उत्सुकतेचा विषय असणार आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु; भाजप - शिवसेना युती सरकारकारला घेरण्यासठी विरोधकांची रणनिती पक्की)

विरोधकांचा चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. तसेच, अधिवेशनासाठी आपण सज्ज आहोत असे सांगतानाच हे सरकार अभासी विकास दाखवत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सरकार नव्हे तर, विरोधकच अभासी झाले आहेत. त्यांची जनतेशी नाळ तुटली आहे. त्यामुळेच ते असा आरोप करत असल्याचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तरादाखल दिलेल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.