Maharashtra HSC Result 2021: महाराष्ट्रात इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता
Exam (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE ) इयत्ता 12 वीचा निकाल (Maharashtra HSC Result 2021) लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा निकाल आज (30 जुलै) किंवा उद्या (30 जुलै) जाहीर होण्याची शक्यता आहे. एमएसबीएसएचएसई (MSBSHSE) ने इयत्ता 12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे या निर्देशानुसार हा निकाल वेळेत जाहीर होईल असे अपेक्षीत आहे. राज्याचे शिक्षण मंत्रालय अथवा शिक्षण मंडळ यांच्याकडून मात्र अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मात्र ही घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, पालकांसाठी हा निकाल mahahsscboard.in आणि mh-hsc.ac.in. या संकेतस्थळांवर उपलब्ध होऊ शकतो. (नक्की वाचा: CBSE Board 12th Result 2021 Declared: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल 99.37%; cbseresults.nic.in वर असे पहा गुण ).

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अद्यापपपर्यंत तरी इयत्ता बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ याबाबत घोषणा केली नाही. निकालाची तारीख आणि वेळ केव्हा जाहीर होते याकडे राज्यातील शिक्षण वर्तुळासह विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. शासन-प्रशासनाकडून अधिकृतरित्या कोणतीही नोटीस अथवा माहिती प्रसिद्ध न झाल्याने गोंधळ वाढला आहे. मात्र, या आधी जाहीर झालेल्या इयत्ता दहाविच्या निकालाचा संदर्भ घ्यायचा तर उद्या (31 जुलै) दुपारी 1 वाजेपर्यंत हा निकाल (इयत्ता बारावी) जाहीर होऊ शकतो. त्याबबतची सूचना आज (30 जुलै) दुपारी 4 वाजता जाहीर होऊ शकते.

महाराष्ट्र बोर्डाने राज्यातील सर्व महाविद्यालयांना 24 जुलै 2021 पर्यंत विद्यार्थ्यांचे गुण जमा करून संगणकीकृत प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यानुसार महाविद्यालयांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. महाविद्यालयांनी जी माहिती महामंडळाकडे पाठवली आहे त्याची पुष्टी करण्यासाठी आवश्यक तपशीलाची पडताळणी (गुण नव्हे) करण्यासाठी ती माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आला होता. (हेही वाचा, CBSE Board Result 2021: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल दुपारी 2 वाजता cbseresults.nic.in, Umang App, Digilocker app, SMS द्वारा कसा पहाल?)

कोरोना व्हायरस महामारीमुळे यंदा राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही परीक्षांचे निकाल हे पर्यायी मुल्यांकन म्हणजेच अंतर्गत मुल्यांकनाद्वारे जाहीर करण्याचा निर्यय शिक्षण मंडळाने आणि राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाबाबत समाधानकारकता नसेल त्यांना फेरपरीक्षेचा पर्यायही खुला असणार आहे.