Couple Found Dead At Chandrapur: चंद्रपूर येथील एका शेतात आढळले पती-पत्नीचे मृतदेह; पोलीस तपास सुरु
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील घुग्गुस (Ghugus) शहरालगत असलेल्या शांतीनगर भागातील शेतशिवारात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हा आकस्मिक मृत्यू आहे की घातपात याबाबत अजूनही संभ्रम आहे. मात्र, जनावरांपासून संरक्षण मिळवण्यासाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

संदेश तक्कला आणि उमेश्वरी तक्कला अशी मृतांची नाव आहेत. संदेश आणि उमेश्वरी हे दोघे शांतीनगर भागात राहत होते. हे दोघेही शनिवारी रात्रीपासून घरी नव्हते. मात्र, शहराला लागून असलेल्या शांतीनगरमध्ये एका व्यक्तीच्या शेतामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह तब्यात घेतले. तसेच हा आकस्मिक मृत्यू की घातपात आहे? याबाबत स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून या घटनेसंदर्भात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा-Nashik: मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या वडील आणि सावत्र आईला अटक

याआधी देवळा तालुक्यातील वाखारवाडी येथे असलेल्या दत्तनगर शिवारातील शेतकरी नानाजी दशरथ निकम (वय, 60) या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली होती. ही शनिवारी (9 जानेवारी) सकाळी शेतावर पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.