सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी दिलेल्या निकालाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 'मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. मराठा समाजास न्याय मिळवून देण्यासाठी शक्य तितके जे जे करता येईल ते ते करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्य सरकार या प्रश्नावर गंभीर आहे. हा प्रश्न तळमळीने सोडविण्याची राज्य सरकारची इच्छा आहे. परंतू, काही मंडळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरुन समाजाला भडकावण्याचे काम करत आहेत. आगी लावण्याचे लोकांचे प्रयत्न आपण सहन करता कामानये', अशीही भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल परब, दिलीप वळसे पाटील, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग थोरात उपस्थित होते.
उच्चस्तरीय बैठकीतील प्रमुख मुद्दे
- मराठा आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात पूर्नविचार याचिका दाखल करण्यात येऊ शकेल काय? याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे.
- सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन न्यायालयाचा अंतरीम आदेश रद्द करण्यात येईल का यासाठी न्यायालयात पूनर्विचार याचिकेत काय मांडणी करावी लागेल, यावर तज्ज्ञांचा सल्ला घेणे.
- अध्यादेश काढून मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण देता येईल काय या संदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा झाली. (हेही वाचा, Udayanraje Bhonsle On Maratha Reservation: भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचा राज्य सरकारला इशारा '.. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा' )
Maharashtra CM Uddhav Thackeray held a high-level meeting today, after the Supreme Court stayed Maratha reservation in the state pic.twitter.com/THjELIy2lr
— ANI (@ANI) September 11, 2020
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी दिलेल्या निर्णयावर विचारविनिमय करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाची एक बैठक काल (11 सप्टेंबर) रात्रीही पार पडली होती. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेलया वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्याचे महाधिवक्ता, विधी विभागाचे सचिव आदी उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील चर्चा करण्यासाठी येत्या शुक्रवारी (11 सप्टेंबर 2020) दुपारी 4 वाजता एक बैठक आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.