Aashadhi Ekadashi 2021 : मुख्यमंत्र्याच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराची महापूजा संपन्न
उद्धव ठाकरे (Photo Credit: twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackarey) यांनी पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackarey) यांच्यासह आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi 2021) शुभ मुहूर्तावर पंढरपुरातील (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Pandharpur Temple) आज सकाळी महापूजा केली आहे. तसेच या कोरोना संकटातून संपूर्ण देशाला बाहेर काढ. अशी पार्थनाही केली आहे. मागील दोन वर्षापासून एकादशीच्या पावन मुहूर्तावर कृष्णेचा काठ अगदी रिकामा दिसत आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून हा काठ पुन्हा भरलेला पहायचा आहे. पंढरपूरात पुन्हा ते आनंदाचे आणि खेळीमेळीचे वातावरण दिसू दे. अशी ईश्वरचर्णी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. वारकऱ्यांशिवाय पंढरपूर अगदी रिकामा वाटत आहे. दरवर्षी हा परिसर वारकऱ्यांनी भरलेला असतो. मात्र याही वर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे कृष्णाकाठ आणि मंदिराचा बाकी परिसर हा निर्मनुष्य आहे.

या सोहळ्याला यंदाच्या वर्षी मानाचे ठरलेली वीणेकरी कोलते दाम्पत्य हेही या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विठ्ठला, या कोरोना संकटातून लवकरात लवकर बाहेर काढ. आणि पुन्हा कोरोना आधीचे जग सर्वांना परत मिळवून दे. अशी आर्त हाक कोलते दाम्पत्यांनी देवाकडे केली आहे. केशव आणि इंदुबारी कोलते असे या दाम्पत्यांचे नाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी सांप्रदाय आणि सरकार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संतांच्या पालख्या पंढरपूर पर्यंतपायी निघाल्या आहेत. नुकतीच मानाच्या पालख्यांनी पंढरपुरात प्रवेश केला आहे. टाळ मृदंगांसह हरिनामाच्या गजरात पालख्या आपल्या मठात प्रवेश करत आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी वारीवरील निर्बंधामध्ये सरकारने मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे.

दरवर्षी सारखे मोठ्या संख्येंने वारकरी वारीमध्ये नसले तरी देखील मोठ्या उत्साहात मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. तसेच बाकी राहिलेल्या पालख्यांही पंढरपूरात लवकरच येतील. यावर्षी वारीत एकूण 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सरकारप्रमाणेच पोलीस प्रशासनाने या वारीसाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. जागोजागी कडक बंदोबस्तात या पालख्यांना त्यांचे निश्चित स्थळी पोहचवण्यात मदत केली आहे. मानाच्या दहा पालख्या असल्याने एकूण 300 वारकरी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा सोहळा पार पडणार आहे. सरकारने वारीवरील अनेक कडक निर्बंध हटवल्यामुळे वारकरी सांप्रदाय़ामध्येही आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान सकाळी पार पडलेल्या महापूजेला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थिती लावली होती. महापूजा 2 तास सुरू असून यंदाचे मानकरी ठरलेल्या कोलते दाम्पत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.