देशात सात टप्प्यातील मतदान संपल्यानंतर रविवारी (19 मे) एक्झिट पोलचा (Exit Poll) निकाल जाहीर करण्यात आला. तर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान पार पडले होते. त्यानंतर आता काल जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात (Maharashtra) युतीला 42 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवता येईल. तसेच देशात 300 जागांचा आकडा पार करुन भाजप पक्षाला बहुमत मिळेल अशा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी व्यक्त केला आहे.
त्याचसोबत शिवसेना आणि भाजप पक्षात छोटा-मोठा भाऊ असा प्रकार राहिला नसून, आमची मने वळली असल्याने हेच चित्र विधानसभेतसुद्धा दिसून येईल असे दानवे यांनी म्हटले आहे. तर 2014 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत भाजप पक्षाला 22 जागा तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. मात्र या दोन्ही पक्षांना मिळून एकूण 42 जागांवर विजय मिळवता आला होता.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा आणि काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळवता आला होता. त्याचसोबत निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचारसभेचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Exit Poll Results 2019 India: 'एक्झिट पोल'चे अंदाज एनडीएच्या बाजूने; देशात पुन्हा मोदी सरकार)
तर जाहीर झालेल्या एक्डिट पोलच्या निकालानुसार एनडीच्या बाजूने बहुमत झुकले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी लाट येणार अशी शक्यता वर्तवली जात असल्याच्या अंदाजावर दानवे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.