Kamgar Sahitya Sammelan 2023: यंदा 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी मिरज येथे होणार राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलन; जाणून घ्या कार्यक्रम
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: archived, edited, representative image)

सतराव्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन दि. २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज, जि. सांगली येथे करण्यात आले असून सर्व कामगारांनी या संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री डॉ.खाडे यांनी संमेलनाबाबत माहिती दिली.

बालगंधर्व नाट्य मंदिर, मिरज, जि.सांगली येथे हे  संमेलन होणार असून  शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. विभागामार्फत संमेलनासाठी इच्छुक कामगारांची नोंदणी करण्यात येत असून अधिक माहितासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास व कार्यलयास भेट द्यावी, असे आवाहन मंत्री डॉ.खाडे यांनी यावेळी केले.

या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक तर कामगारमंत्री ना. डॉ. सुरेश  खाडे स्वागताध्यक्ष असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इलदे या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आहेत.

डॉ.भवाळकर यांनी लोकसंस्कृतीविषयी विपुल लेखन केले असून मराठी विश्वकोश, मराठी ग्रंथकोश आदी महत्वाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. तसेच नाटक, कथासंग्रह, वैचारिक, ललित लेखन, समीक्षात्मक अशा विविध प्रकारची साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे. (हेही वाचा: Maharashtra Bhushan: पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार घोषीत)

संमेलनाच्या पहिल्या सत्रात ‘चला उद्योजक होऊया’ विषयावर डॉ. विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स ग्रुप लि.), गिरीश चितळे (चितळे उद्योग समुह), हनुमंतराव गायकवाड (भारत विकास ग्रुप इंडिया लि.) या उद्योजकांची प्रकट मुलाखत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कामगार चळवळीची कथा आणि व्यथा’, ‘मराठी साहित्यात कामगार जीवनाचे चित्र शोधताना’, ‘आम्ही का लिहितो ?’, ‘व्यसनमुक्तीची लढाई या विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर कवींचे कवी संमेलन आणि काव्य मैफिलीचा रसिक प्रक्षेकांना आस्वाद घेता येणार आहे. निमंत्रित तसेच कामगार कवींचा कवी संमेलनात सहभाग असेल. संमेलनात कथाकथनाचे सादरीकरण होणार असून अभिरुप न्यायालयदेखील भरवले जाणार आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार अभिरुप न्यायालय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.