
पुण्याच्या (Pune) हिंजवडी (Hinjawadi) येथील आयटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) हिंजवडी फेज-3 (टीसीएस सर्कल) ते छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक पर्यंत नवीन शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल आहे. एमएसआरटीसी हिंजवडी फेज-3 (टीसीएस सर्कल) ते छत्रपती संभाजीनगरला जोडणारी ही नवीन शिवनेरी बस सेवा शुक्रवार, 6 जूनपासून सुरू होणार आहे.
विद्यार्थी, आयटी कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर आणि मुंबईला जाण्यासाठी बस पकडण्यासाठी महामार्गांवर उभे राहावे लागू नये म्हणून, पुण्याच्या पश्चिमेला ट्रान्झिट हब (बस डेपो) बांधण्याची मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (FITE) महाराष्ट्रने केली होती. त्यानंतर काही आठवड्यांनी आता हा नवीन शिवनेरी बास चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुण्याच्या पश्चिम भागात हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, औंध, बावधन, सुस, पाषाण आणि कोथरूडचा काही भाग असे वेगाने विकसित होणारे भाग समाविष्ट आहेत. हे परिसर आयटी, निवासी आणि शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आले आहेत, ज्यामुळे अनेक व्यावसायिक, विद्यार्थी आणि कुटुंबांची मोठी लोकसंख्या या परिसराकडे आकर्षित होत आहे. या सर्वांसाठी ही शिवनेरी बससेवा नक्कीच फायद्याची ठरेल. (हेही वाचा: MSRTC: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जून 2025 पासून मिळणार 53% महागाई भत्ता, 1 कोटी रुपयांचा अपघात विमा आणि वर्षभराचा मोफत प्रवास पास)
या बसेसच्या विकेंडच्या वेळा:
संभाजीनगर: शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता निघेल व येणारी बस सकाळी साडेचार वाजता पुण्यात पोहोचेल.
कोल्हापूर: शुक्रवारी सायंकाळी 4.45 वाजता निघते व येणारी सोमवारी पहाटे 4 वाजता परत येईल.
नाशिक: शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता निघते, सोमवारी पहाटे 4.30 वाजता परत येते.
याची तिकिटे एमएसआरटीसी वेबसाइट किंवा मोबाईल अॅप (Android आणि iOS) वर बुक करता येतील.
भाडे:
पुरुषांसाठी- 968 रुपये.
महिला- 511 रुपये.
ज्येष्ठ नागरिक (65-74वर्षे)- 511 रुपये.
ज्येष्ठ नागरिक (75+ वर्षे): मोफत
दरम्यान, सध्या, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वारगेट, शिवाजीनगर/वाकडेवाडी, पिंपरी-चिंचवडमधील एक आणि पुणे स्टेशन (शिवनेरी) येथे चार बस स्थानके चालवते. मेट्रो बांधकामासाठी शिवाजीनगर येथील मूळ एमएसआरटीसी बस स्टँड वाकडेवाडी येथे हलवण्यात आला. स्वारगेट हे राज्याच्या सर्व भागांमध्ये प्रवासासाठी एक प्रमुख केंद्र आहे. मात्र, आयटी आणि औद्योगिक केंद्र असलेल्या हिंजवडी आणि वाकड भागातील लोकांसाठी ही सर्व स्थानके त्यांच्यापासून दूर आहे आणि त्यामुळे त्यांना महामार्गावरील विविध बस थांब्यांवरून त्यांच्या गावी जाण्यासाठी बस पकडाव्या लागतात. म्हणूनच आता या भागांचा विकास अधिक होत असल्याने, प्रवाशांच्या सोयीसाठी फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजने या भागात बस स्थानकाची मागणी केली आहे.