Gulabrao Patil: 'मंत्रिपद गेलं खड्ड्यात, सोडणार नाही', गुलाबराव पाटील यांनी असं का म्हटलं? घ्या जाणून
Gulabrao Patil | (Photo Credit - Facebook)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल राज्यपाल आणि भाजप (BJP) नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरु असल्याचे दिसते. भाजपचा नेता एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्ये करताना दिसत आहे. राज्याच्या जनतेमध्ये या वक्तव्यांविरोधात प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले आहे. राजकीय पक्षांनीही या वक्तव्यांवरुन जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी निदर्शने आणि आंदोलनेही सुरु आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही नाराजी व्यक्त करत सरकारमधील मित्रपक्षाला घरचा आहेर दिला आहे. 'मंत्रिपद गेलं खड्डयात.. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही' असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याबाबत एखादी अचारसंहिताच असावी की काय असे अता वाटू लागले आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचले आहे त्यांनीच शिवछत्रपतींबद्दल बोलावे. बाकीच्यांनी उगाच तोंड उघडू नये. उगाच कुणीही उंबरसुंबे काहीही बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज हे देव आहेत. ते देवांचेही देव आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना नेहमी आदरानेच बोलले जावे. ज्यांचा अभ्यास नाही त्यांनी मुळीच बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. मग तो कोणताही पक्षाचा असला तरी खपवून घेतले जाणार नाही. मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. शिवजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार भाजपात येणार फक्त पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरायचा बाकी, गुलाबराब पाटलांचं खळबळजनक खुलासा)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख जुना आदर्श असा केला. त्यानंतर भाजपचे एक राष्ट्रीय प्रवक्ते यांनी तर एका वृत्तवाहीनिवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची माफीच मागितल्याचे अत्यंत तथ्यहीने विधान केले. वरुन माफी मागण्याऐवजी मी असे बललोच नसल्याचेही सांगितले. या प्रकरणावरुन सुरु असलेला वाद कायम असतानाच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आणि पुन्हा एकदा राज्याचे वातावरण ढवळून निघाले. नवा वाद सुरु झाला.