ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार 500 नवीन रुग्णवाहिका; राजेश टोपे यांची माहिती
Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना 500 नवीन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात यासंदर्भात घोषणा केली होती. या नवीन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात माहिती देताना राजेश टोप म्हणाले की, मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या 1 हजार रुग्णवाहिका टप्प्याटप्प्याने बदलून त्याजागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. यावर्षी 500 आणि पुढील वर्षी 500 अशा नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार, असे त्यांनी जाहीर केले होते. सध्या बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्तीयोग्य न राहिल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत, असंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - आमदार रोहित पवार यांचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा, 'महाविकासआघाडीत घ्या, म्हणत शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!')

दरम्यान, यावर्षी 500 नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी 89 कोटी 48 लाख अंदाजित खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली. त्यानुसार, एक महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्र्याने सांगितले. या 500 नवीन रुग्णवाहिका 253 प्राथमिक आरोग्य केंद्र, 137 ग्रामीण रुग्णालये, 106 जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि 4 प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं आहे.