Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनची माघार
Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण, मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी परतला (Monsoon Withdrawal) आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. मात्र, आता संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी गेल्याने शेतकऱ्यांना आपलं उर्वरीत पीक वाचवणं शक्य होणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून 23 ऑक्टोबरला राज्यातून तसेच संपूर्ण देशातून बाहेर पडला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 123 टक्के पाऊस पडला आहे. यंदा सरासरीच्या तब्बल 23 टक्के जास्त पाऊस झाला आहे. (हेही वाचा - Maharashtra Government Decision: शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा परिषदांमधील 13 हजार 514 रिक्त पदांची भरती प्रक्रिया केली रद्द)

नैऋत्य मान्सून अखेर रविवारी संपूर्ण देशातून बाहेर पडला, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले. साधारण देशातून मान्सून परतण्याची तारीख 15 ऑक्टोबर आहे. परंतु, यावर्शी मान्सून ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबला. मान्सून आता मुंबई, पुणे आणि नाशिकमधून माघारी परतला आहे. मान्सून माघारी गेल्याने देशातील बहुतांश भागात यंदा पाऊसमुक्त दिवाळीचा आनंद लुटता येणार आहे.

साधारणपणे, ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यापर्यंत, नैऋत्य मान्सून संपूर्ण वायव्य, उत्तरेकडील आणि भारत-गंगेच्या मैदानाच्या अनेक भागांमधून उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत आणि महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंडच्या बहुतांश भागांतून माघार घेतो. परंतु यावर्षी, देशातील अनेक भागात पाऊस बरसला. दरम्यान, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही भागांतून सतत ओलावा असलेल्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागांत मान्सून मागे जाण्यास विलंब झाला.