Nilesh Rane vs Ravindra Chavan: निलेश राणे यांची राजकारणातून आकस्मिक निवृत्ती; भाजपकडून मनधरणी
Nilesh Rane | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याचा निर्णय विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मुहूर्त गाटून जाहीर केला. त्यानंतर भारतीय जनात पक्षात काहीशी हालचाल झाली आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु झाले. मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पुढच्या काहीच तासांमध्ये म्हणजे आज सकाळी वाजता नितेश राणे यांची भेट घेतली. जी जवळपास 10.30 पर्यंत चालली. त्यानंतर दोघांनीही सागर बंगला गाठला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. इथेही पुन्हा राणे, चव्हाण आणि फडणवीस यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर चव्हाण यांनी राणे यांच्या उपस्थितीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

निलेश राणे हे भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नते आहेत. त्यांनी काही कारणांमुळे काल घोषणा केली. मात्र, कधी कधी कार्यकर्त्यांच्या नाराजीतून असे निर्णय घ्यावे लागतात. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांना डावलले जाऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही त्यांची भावना आहे. रास्त भावनेसाठी त्यांनी काही निर्णय घेतला असला तरी ते आमचे महत्त्वाचे नेते आहेत. संघटनेत कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. मात्र, यापुढे अधिक सतर्क राहू. कोणीही नाराज होणार नाही, सर्वांशी संवाद साधून निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले.

निलेश राणे यांनी एक्स (जुने ट्विटर) पोस्टच्या माध्यमातून राजीनामा देत असल्याचे जाहीर करत आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली होती. त्यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटले होते की, ''नमस्कार,मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!

निलेश राणे यांच्या राजीनामाच्या घोषणे मुळे कोकणातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना पक्षसंघटनेत काम करत असताना व्यक्तीगत राजीनामा देण्यास मुभा नसते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहेत.