Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

भाईंदर (Bhayandar News) येथील उत्तन परिसरात असलेल्या 'केअरिंग हँड्स सेवा कुटीर' अनाधाश्रमात (Orphanage) असलेल्या एका मुलाने आत्महत्या (news) केली आहे. तो आठ वर्षांचा होता. आश्रमातीलच एका विहिरीत उडी घेत त्याने जीव दिला. आईच्या सहवासाला व्याकूळ झालेल्या या मुलाने टोकाचे पाऊल गाठले. त्याच्या आईने दुसरा विवाह केल्याने त्याला अनाथाश्रमात ठेवण्यात आले होते. त्यामुळे तो आपल्या आईला सतत 'मला घेऊन चल.. मला येथे राहायचे नाही' अशी विनवणी करत होता. त्याची आर्त हाक आईपर्यंत पोहोचलीच नाही. परिणामी ती त्याला तिथेच सोडून गेल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. (Mumbai Crime News)

'मला येऊन घेऊन चल'

आईने विनवणी न ऐकल्याने आणि आईच्या सहवासासाठी व्याकूळ झालेल्या या मुलाला भावना असह्य झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे भाईंदर येथे खळबळ उडाली आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, सदर मुलास आठ महिन्यांपूर्वी या अनाथाश्रमात दाखल करण्यात आले होते. त्याच्या आईने दुसरा विवाह केल्याने त्याची येथे पाठवणी करण्यात आली होती. मात्र, आश्रमात आल्यापासून तो अस्वस्थ होत होता. तो येथे राहायला आला असला तरी, त्याची आई अधूनमधून त्याला येथे भेटण्यासाठी येत होती. ती जेव्हा केव्हा त्याला भेटायला यायची तेव्हा तो रडायचा.. मला येऊन घेऊन चल म्हणायचा. मला येथे राहायचे नाही.. मला तुझ्यासोबतच राहायचे आहे, अशी तो विनवणी करायचा. पण, त्याची आई त्याला तिथेच सोडून जायची. (हेही वाचा, Mumbai Crime: सहा वर्षांच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी शिकवणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल)

'आईचे हृदय द्रावले नाही'

पाठिमागील महिन्यात या मुलाची आई त्याला भेटण्यासाठी अनाथाश्रमात आली होती. या वेळीही त्याने तिच्याकडे मला घेऊन चल.. मला येथे करमत नाही. मला तुझ्यासोबतच राहायचे आहे, अशी गळ घातली. पण, आईचे हृदय द्रावले नाही किंवा त्याला घेऊन जाण्यासारखी परिस्थिती नसल्याने तिने त्याला घेऊन जाणे टाळले. ती त्याला तेथेच सोडून गेली. त्यानंतर हा मुलगा प्रचंड निराश झाला. अखेर सोमवारी रात्री अनाथाश्रमातील सर्वजण झोपी गेले असता या मुलाने जवळच असलेली विहीर गाठली आणि त्यात उडी घेऊन आयुष्य संपवले. सकाळी सर्वांना जाग आली असता हा मुलगा आढळून आला नाही. त्यामुळे शोधाशोध केली असता जवळच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. घडल्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.