Bombay High Court | (Photo Credits: ANI)

बदलापूर (Badlapur) मध्ये आदर्श विद्या मंदिर  (Adarsh Vidya Mandir) मध्ये शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या अक्षय शिंदे (Akshay Shinde) चा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे. पण त्याच्या मृत्यू पश्चात आता दहन ऐवजी दफन विधी करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला आहे पण अद्याप मुंबई आणि आजूबाजूच्या कोठेही दफन विधी साठी जागा मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंतिम विधी करण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार घेऊन त्याचे कुटुंबिय कोर्टात गेले होते. मुंबई उच्च न्यायालयाकडून आज यावर सुनावणी झाली आहे. या सुनावणी मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सोमवार 30 सप्टेंबर पर्यंत अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दफन करा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकार जागा देणार असल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले आहे.

बदलापूर मध्ये अक्षय शिंदे चं प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनाही घरात राहू देण्यात आलं नव्हतं. तसेच त्याच्या एन्काऊंटर नंतरही बदलापूर येथील नागरिकांनी त्याच्या अंत्यविधीला जागा देण्यास नकार दिला आहे. या विरोधात अक्षय शिंदे चे आई वडील कोर्टात गेले होते. Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपीचे वडील Anna Shinde यांच्याकडून Bombay HC मध्ये याचिका दाखल; 'बनावट एन्काऊंटर मध्ये मारल्याचा' आरोप .

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे जे जे हॉस्पिटल मध्ये पोस्टमार्टम झाले आहे. त्यानंतर कुटुंब त्याचा मृतदेह स्वीकारू शकणार आहेत. पण त्याच्या मृतदेहाची अवहेलना होत असल्याने शिंदे कुटुंब कोर्टात गेले आहे.आजच्या सुनावणी मध्ये राज्य सरकारच्या वकिलांनी दफन विधीसाठी जागा देण्याबाबत ग्वाही दिली आहे.

दहन ऐवजी अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनी दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिंदे कुटुंबियांनी मुलाचा बनावट एन्काऊंटर मध्ये खून झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्याच्या मृतदेहाला पुरल्यास पुरावा म्हणून गरज लागल्यास तो काढता यावा म्हणून हा दहन ऐवजी दफन विधी करण्याचा निर्णय घेतला आहे.