पंकजा मुंडे (PC - Facebook)

Maratha vs OBC: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे (Lok Sabha Elections 2024) बीड जिल्ह्यातील राजकारणावर आणि तेथील जनतेवर खोल परिणाम झाले आहेत. सध्या बीड जिल्ह्यात ओबीसी (OBC) आणि मराठा समाजात (Maratha Community) तीव्र राजकीय फूट पडलेली दिसत आहे. यापूर्वी बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Constituency) ओबीसी उमेदवाराचे वर्चस्व असताना यावेळी मात्र याठिकाणी मराठा समाजाच्या उमेदवाराने विजय मिळवला. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील भाजप आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात 2 समर्थकांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दिघोळ आंबा गावात 30 वर्षीय पांडुरंग सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवाने नाराज होऊन आपली जीवनयात्रा संपवली. मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून अवघ्या 6 हजार मतांनी पराभव झाला. मृत पांडुरंग यांनी पंकजा मुंडे यांच्या विजयावर मोठ्या आशा बाळगल्या होत्या. त्यांचा असा विश्वास होता की, पंकजा मुंडे निवडुण आल्यानंतर बीड जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करतील आणि जिल्ह्याचा विकास करतील. (हेही वाचा -Pankaja Munde: 'जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो', 'हात जोडून विनंती करते'; समर्थकांच्या आत्महत्यांनंतर पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन (Watch Video))

पांडुरंग सोनवणे यांचा भाऊ सौदागर सोनवणे यांनी सांगितले की, पराभवानंतर पांडुरंग खूप विचित्र वागत होता. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण डॉक्टरांना पांडुरंगला काय झाले ते समजले नाही. त्याला पंकजा ताई भेटायला येणार होत्या. परंतु, 9 जून रोजी पहाटे शेतात जाऊन त्याने फाशी घेतली. पांडुरंग सोनवणे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये असं लिहिलं आहे की, 'माझं नाव पांडुरंग सोनावणे आहे, माझ्या पंकजा मुंडे ताई साहेबांचा निवडणुकीत पराभव झाला. मला ते सहन होत नाही आणि म्हणून मी आत्महत्या करत आहे.' (हेही वाचा -Lok Sabha Election 2024 Results: बीडमध्ये Pankaja Munde यांचा मोठा पराभव; Bajrang Sonwane होणार नवे खासदार)

पांडुरंग यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले आणि वृद्ध आईवडील आहेत. ज्यांच्यासाठी तो एकमेव कमावणारा होता. त्यांचा मृत्यू हा एक दुःखदायक घटना आहे. पंकजा मुंडे यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर तीन समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात बीड जिल्ह्यात दोन आणि लातूर जिल्ह्यात एका समर्थकाचा समावेश आहे. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024 Results: 'त्यांनी आमचे सरकार पाडले, आमचा पक्ष फोडला...'; निवडणूक निकालानंतर Aaditya Thackeray यांनी व्यक्त केल्या भावना)

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या समर्थकांना असे कठोर पाऊल उचलू नये, असे आवाहन केले आहे. आणखी एका दु:खद घटनेत जरूड तालुक्यातील मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या 22 वर्षीय रामेश्वर काकडे याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. रामेश्वरच्या गावातील एका व्यक्तीने सांगितले की, 'रामेश्वर हा हुशार आणि महत्वाकांक्षी मुलगा होता. ओबीसी विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत असल्याचे पाहून त्याच्यावर प्रचंड दबाव होता. गुरुवार, 13 जून रोजी त्याने आमच्या गावातील झाडाला गळफास लावून घेतला.'

तथापी, निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात सामाजिक तणावही वाढला आहे. आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टमुळे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले की, निवडणुकीनंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट पाहिल्या आहेत. आम्ही या प्रकरणी 36 एफआयआर दाखल करून अटक केली आहे. आम्ही गावोगावी फिरून अशा मजकूर टाकणाऱ्यांवर कारवाई करत आहोत.