राज्यांतर्गत रस्ते वाहतूक, विमान व रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा; शरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
Sharad Pawar (Photo Credit: PTI)

लॉकडाऊनमुळे (Lockdown) वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. आपण राज्यांतर्गत रस्ते वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्याकरता योग्य ती पाऊले उचलावीत तसेच विमान व रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. शरद पवार यांनी आज कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. यामध्ये वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर त्यांनी सुचना मांडल्या.

राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून राज्याचे मंत्री आणि अधिकारी यांची उपस्थिती वाढणे आवश्यक आहे. मंत्री व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी योग्य त्या सुचना निर्गमित व्हाव्यात. तसेच सरकारी व खासगी बंदरांतील कामाचा वेग काहीसा थंडावला आहे. त्यामुळे आयात, निर्यात व देशांतर्गत जलवाहतूक वाढवण्याकरता त्या क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक व तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करावी, अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. (हेही वाचा - Coronavirus: शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही एक पत्र लिहावं- देवेंद्र फडणवीस)

लॉकडाऊनच्या अटी शिथील करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी -

दरम्यान, पूर्वी मागास, अविकसीत भागात उद्योगांना प्रोत्साहन योजना राबवल्या जात. त्या धर्तीवर राज्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, उद्योग वाढीसाठी नवीन सवलतींचे प्रोत्साहनपर धोरण आणणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काही अटी शिथील करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल. याकरता दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनामार्फत आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी. दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापनं टप्प्याटप्प्याने उघडली जातील, अशी व्यवस्था करावी.

जनतेमध्ये व्यापक जागृती घडवणे आवश्यक -

कोरोना हा आजार इतक्या लवकर हद्दपार होणार नाही. त्यामुळे कोरोना हा जीवनाचा एक भाग समजून, त्याच्यापासून सावध राहून, आरोग्य सांभाळण्याबाबत जनतेमध्ये व्यापक जागृती घडवणे आवश्यक आहे. जपानमध्ये संसर्ग नसतानाही लोक दैनंदिन जीवनात मास्क घालणे, वैयक्तिक स्वच्छता वगैरे पथ्ये पाळतात, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे -

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हातमोजे घालणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, हात साबणाने वेळोवेळी धुणे, सोशल डिस्टंसिंग हा दैनंदिन नित्यक्रम लोकांनी अवलंबावा. यासाठी माहिती-जनसंपर्क विभाग, प्रसारमाध्यमे, जाहिराती यांच्याद्वारे जनजागृती, माहिती व सूचनांचे प्रसारण व्हावे, असं आवाहनही शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे.