Tulsi Vivah 2019: वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘ही’ कामे
तुलसी विवाह 2019 (Photo Credits: Facebook)

दिवाळी संपली की सर्वांना तुळशी विवाहाचे वेध लागतात. कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला (Tulsi Vivah) सुरुवात होते. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला महत्त्व आहे. त्यामुळे विवाहित जोडप्याने तुळशी विवाह करणं खूप गरजेचं आहे. तुळशी विवाह केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

यंदा 9 नोव्हेंबरला तुळशी विवाहाला सुरुवात होणार असून 12 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातही काही समस्या असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी खालील कार्य केल्यास त्या नष्ट होतील. तसेच तुमच्या वैवाहिक जीवनात सुख आणि शांती लाभेल. त्यासाठी तुम्हाला तुळशी विवाहाच्या दिवशी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. चला  तर मग ‘लेटेस्ट ली’ मराठीच्या या खास लेखातून जाणून घेऊयात या कार्याविषयी...

हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशी पूजन करताना ‘या’ 5 गोष्टी केल्यास होईल भरपूर धनलाभ

तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘हे’ कार्य –

  • तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाने तुळशीच्या रोपाखाली तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनातील सुख येईल.
  • तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नेहमी भांडण होत असेल तर तुळशी विवाह झाल्यानंतर 'ऊं नमों भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करा. याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवेल.
  • पती आणि पत्नी यांच्यातील प्रेम कमी होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. तुळशी विवाहाच्या दिवशी तुमच्या बेडरुममध्ये राधा कृष्णचा फोटो लावा, असं केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.
  • महिलांना आपल्या वैवाहिक जीवनात सुख हवे असेल तर, तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावनात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच दिवा लावून झाल्यानंतर विष्णूच्या नावाचा जप करा.
  • एखाद्या मुलीचे लग्न जमत नसेल तर तुळशीच्या विवाहाच्या दिवशी पिवळ्या कपड्यात हळद, केसर, गुळ आणि हरभऱ्याची दाळ बांधून तो कपडा भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण करा.
  • तसेच तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास केल्याने पुरुषाचे लग्न लवकर जमण्यास मदत होते.
  • तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची 11 पाने आणि भगवान विष्णूची मूर्ती आपल्या बेडरुममध्ये ठेवा. असं केल्याने तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावरील प्रेम वाढण्यास मदत होईल.
  • तुम्हाला पाहिजे तसा पती मिळण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण करा. विवाह संपल्यानंतर ही ओढणी कायम तुमच्याकडे राहूद्या. असं केल्याने तुम्हाला हवा तसा पती मिळेल.
  • तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची पाने तोडून ती पाण्यात टाका. हे पाणी घराच्या दरवाजावर शिंपडा. असं केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट नजर असलेल्या शक्ती नष्ट होतील.

पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. असं म्हटलं जातं की, तुळशीचे लग्न लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजेच घरात धनधान्य, संपत्ती आणि इतर मालमत्ता वाढते. अर्थात याला अद्याप तरी वैज्ञानिक आधार प्राप्त झाला नाही.