
भगवान विष्णू यांच्या अवतारांपैकी एक असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या सन्मानार्थ जगन्नाथ पुरीची रथ यात्रा (Jagannath Puri Rath Yatra) काढली जाते. यानिमित्त काढलेल्या रथ यात्रेमध्ये त्यांच्या भावंडांसह, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचाही त्यामध्ये समावेश असतो. रथयात्रा हा भगवान जगन्नाथांच्या पुरीतील त्यांच्या मंदिरापासून त्यांच्या मावशीच्या मंदिरापर्यंत, सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरापर्यंतच्या प्रवासाचा उत्सव आहे. हा सण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. आज जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेला सुरूवात होणार आहे. त्या निमित्त देशभर आनंदाचं वातावरण आहे. मग अशा या मंगलपर्वाच्या शुभेच्छा तुमच्या प्रिय व्यक्ती, नातेवाईक, आप्तेष्टांना देत हा दिवस खास करा.
रथ लाकडाने तयार केले जातात तर रंगीबेरंगी कापड आणि फुलांनी आकर्षक अंदाजात सजवले जातात. या रथयात्रेमाध्ये सहभागी होऊन रथ ओढल्याने जीवनातील सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते.





पौराणिक कथेनुसार, एकदा देवी सुभद्रा यांनी पुरी शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांनी तिला रथावर बसवून शहर भ्रमंतीसाठी बाहेर पडले आणि वाटेत त्यांच्या मामी गुंडीचाच्या मंदिरात काही दिवस राहिले. तेव्हापासून, या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी रथयात्रा आयोजित केली जाते. तिन्ही रथ गुंडीचा मंदिरात जातात आणि सात दिवस तिथे विश्रांती घेतात. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी देशा-परदेशातून भाविक येतात.