स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रभर 'बलिदान मास' पाळला जातो. मुघल सम्राट औरंगजेबाच्या कैदेत असताना 40 दिवस सोसलेल्या अमानुष यातना आणि त्यानंतरही धर्माशी न सोडलेली निष्ठा, या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवभक्त या काळात विविध उपक्रम राबवत आहेत. या 40 दिवसांच्या कालखंडात साधेपणाने राहून आपल्या राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
बलिदान मासाची पार्श्वभूमी आणि इतिहास
बलिदान मास म्हणजे काय- इतिहासाच्या नोंदीनुसार, 1689 मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने कैद केले होते. त्यानंतर सलग 40 दिवस त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागला. औरंगजेबाने स्वराज्य सोडण्याची आणि धर्मपरिवर्तनाची अट ठेवली होती, मात्र संभाजी महाराजांनी मृत्यू पत्करला पण स्वराज्य आणि स्वाभिमान सोडला नाही. फाल्गुन अमावस्येला त्यांची हत्या करण्यात आली. याच 40 दिवसांच्या स्मृतींना 'बलिदान मास' म्हणून पाळले जाते.
2026 मधील महत्त्व आणि स्वरूप
2026 मध्ये हा संभाजी महाराज बलिदान मास बलिदान मास फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाळला जात आहे. या काळात अनेक शिवभक्त आणि तरुण पिढी स्वतःहून काही बंधने पाळतात. यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश असतो:
आवडत्या पदार्थांचा त्याग: अनेक जण या काळात गोड पदार्थ किंवा आपली आवडती वस्तू खाणे वर्ज्य करतात.
साधे राहणीमान: काही शिवभक्त 40 दिवस अनवाणी चालणे किंवा जमिनीवर झोपणे यांसारखी व्रते करतात.
इतिहास वाचन: तरुणांमध्ये महाराजांच्या इतिहासाबद्दल जागृती करण्यासाठी 'बुधभूषण' आणि इतर ऐतिहासिक ग्रंथांचे वाचन केले जाते.
विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रम
तुळापूर आणि वढू बुद्रुक यांसारख्या ऐतिहासिक स्थळांवर शिवभक्तांची मोठी गर्दी दिसून येते. याशिवाय गावोगावी व्याख्याने, पोवाडे आणि मूक पदयात्रांचे आयोजन केले जाते. फाल्गुन अमावस्येला या मासाची सांगता मोठ्या आदरांजली सभेने करण्यात येते.