
Bhagwat Ekadashi 2020: वारकरी संप्रादयामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसर्या दिवशी उपवास सोडला जातो.
एकादशीत 'स्मार्त' आणि 'भागवत', असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद येतात. त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी 'स्मार्त' व दुसर्या दिवशी 'भागवत', असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात 'स्मार्त' आणि 'भागवत', अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते. परंतु, भागवत एकादशीला नाव नसते. यावेळी 19 मार्चला पापमोचनी स्मार्त एकादशी आहे. तर आज संपूर्ण राज्यात भागवत एकादशी (Bhagwat Ekadashi 2020) साजरी होत आहे. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा कशा पद्धतीने करावी तसेच एकादशीचे नेमकं महत्त्व काय याविषयी जाणून घेऊयात...
भागवत एकादशी पूजाविधी -
वारकरी संप्रादयामध्ये परंपरेने 20 मार्चची भागवत एकादशी साजरी केली जाते. यामुळे द्वादशी 21 मार्चला व त्रयोदशीला 22 मार्चला साजरी करण्यात येणार आहे. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते, असे पौराणिक कथेत म्हटले आहे.
एकादशीचे महत्त्व -
वारकरी संप्रादयामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो.
याशिवाय कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. पौराणिक कथेनुसार, एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.