Oscar Fernandes Passes Away: काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस (Oscar Fernandes) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. फर्नांडिस हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मंगळुरू (Mangalore) येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. फर्नांडिस यांच्या निधनानंतर काँगेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
फर्नांडिस यांची काही दिवसांपूर्वी ब्रेन सर्जरी झाली होती. त्यानंतर ते कोमात गेले होते. दरम्यान, फर्नांडिस हे घरी योगाभ्यास करीतर असताना खाली पडले. ज्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना मंगळुरू येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. हे देखील वाचा- Political Journey Of Bhupendra Patel: भूपेंद्र पटेल आमदार म्हणून आले आणि पहिल्याच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले, जाणून घ्या असे कसे घडले?
ट्वीट-
We are deeply saddened by the demise of Shri Oscar Fernandes ji, our heartfelt condolences to his family.
A Congress stalwart, his vision for an inclusive India had a huge influence on the politics of our times.
The Congress family will deeply miss his mentorship & guidance. pic.twitter.com/UXcLI765yP
— Congress (@INCIndia) September 13, 2021
फर्नांडिस यांनी 1975-76 मध्ये उडुपीमध्ये नगरपरिषद म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. ते 1980 मध्ये उडुपीमधून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर सलग पाच वेळा त्यांनी उडुपीचे प्रतिनिधित्व केले. फर्नांडिस यांचे वडील रोके फर्नांडिस हे शिक्षणतज्ज्ञ होते, ज्यांनी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच त्यांची आई लिओनिसा फर्नांडिस भारतातील पहिल्या महिला दंडाधिकारी होत्या.
फर्नांडिस यांनी 1984-85 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून काम केले. त्यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले गेले. 1999 ची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर फर्नांडिस यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी महमोहन सिंह सरकारच्या काळात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, परदेशातील भारतीय व्यवहार, युवक आणि क्रीडा व्यवहार आणि कामगार आणि रोजगार अशा अनेक खात्यांची देखरेख करणारे राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर 2013 पासून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते.