Ahmedabad Plane Crash | (Photo Credit- ANI)

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर (Air India Plane Crash) आता टाटा समूहाने (Tata Group) अपघातस्थळी विमानाबाहेर मृत्युमुखी पडलेल्या 33 जणांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या घोषणेमुळे विमानात नसलेल्या परंतु विमान कोसळताना झालेल्या स्फोटामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अपघातग्रस्त विमान बीजे मेडिकल कॉलेजवळ कोसळलं होतं. एक प्रवासी सोडता इतर सर्व प्रवाशांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. तथापि, हे विमान ज्या कॉलेजच्या मेसवर कोसळले तेथील अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांचा देखील यात मृत्यू झाला. विमानातील प्रवाशी तसेच अपघातस्थळी उपस्थित असलेल्या अतिरिक्त 33 जणांच्या मृत्यूसह, एकूण मृतांची संख्या आता 274 झाली आहे.

दरम्यान, एका निवेदनात, टाटा समूहाने पुष्टी केली की, या 33 बळींच्या कुटुंबियांना देखील 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देखील दिली जाईल. अपघातात जखमी झालेल्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च आणि त्यांना शक्य तितकी सर्व प्रकारे मदत करण्याचे आवाहनही टाटा समूहाकडून करण्यात आले आहे. मृत आणि जखमींमध्ये डॉक्टर, विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी आणि मेघानी नगर परिसरातील स्थानिक रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - DGCA Orders Boeing 787 Inspection: अहमदाबाद दुर्घटनेनंतर 'डीजीसीए'ला खडबडून जाग, बोईंग 787 विमानांची तातडीने सुरक्षा तपासणीचे आदेश)

वसतिगृहाच्या इमारतीचेही मोठे नुकसान -

तथापि, या अपघातात बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. टाटा समूहाने या इमारतीच्या पुनर्बांधणीची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, मदत पॅकेजचा भाग म्हणून पीडितांच्या कुटुंबियांना नोकरी दिली जाईल का असे विचारले असता, टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, कारण तपास आणि परिस्थितीचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे. (हेही वाचा, Air India AI-171 Crash: अहमदाबाद येथे घराच्या छतावर Black Box सापडला, विमान अपघात प्रकरणी चौकशी सुरु)

टाटा समूहाने जाहीर केलेल्या 1कोटी रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त, प्रवाशांच्या कुटुंबियांना विविध विमा कंपन्यांकडून सुमारे 1.5 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे. एअर इंडियाच्या प्राथमिक विमा कंपन्यांमध्ये टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या यांचा समावेश आहे.