Maharashtra Unseasonal Rain: राज्य सरकारकडून अवकाळी पावसाचा आढावा, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात बैठक
Ajit Pawar | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेणार आहे. तसेच केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी 2600 कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली असून, यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.  (हेही वाचा - Mumbai Air Quality: पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, आजही पावसाची शक्यता)

नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकार तातडीची मदत देण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज बोलवण्यात आलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार राज्यात परवापासून अवकाळी पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व गारपिटीने 17 जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.