Arun Jaitley यांचे निधन, दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Senior BJP Leader, Former Union Finance Minister Arun Jaitley | (Photo Credits: PTI)

Arun Jaitley Passes Away: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांचे आज 24 ऑगस्ट रोजी 12 वाजून 7 मिनिटांनी  निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. दिल्ली (Delhi) येथील एम्स (AIIMS Hospital) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ काळ जेटली हे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांच्यावर किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून येत होते. दरम्यान, एम्समध्ये जेटली यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मेडीकल बुलेटीन जारी करत जेटली यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. मात्र, सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले होते की, जेटली यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.

ANI ट्विट

अरुण जेटली हे मधुमेहानेही त्रस्त होते. त्यांच्यावर किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना सॉफ्ट टिशू कॅन्सर झाल्याचेही निदान झाले होते. त्यांनी लठ्ठपणापासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी बैरिएट्रिक सर्जरीही केली होती. जेटली यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एम्समध्ये दाखल झाले होते. (Arun Jaitley Passes Away: अरुण जेटली यांचे व्यक्तिगत जीवन, शिक्षण आणि राजकीय कारकीर्द)

जेटली यांना श्वसनास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेटली यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याने त्यांना श्वसनास त्रास होत होता. तसेच, त्यांना सॉफ्ट टिशू सरकोमा (एक प्रकारचा कर्करोग) झाल्याचेही सांगण्यात येत होते. दरम्यान, एम्सने शुक्रवारी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये जेटली यांच्या प्रकृतीबद्दल हेमोडायनैमिकली (haemodynamic) स्टेबल असे म्हटले होते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत रुग्णाचे ब्लड प्रेशर आणि पल्स व्यवस्थित काम करत आहे, असा होतो. जेटली यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी म्हटले होते. त्यानंतर एम्सने कोणतीच प्रतिक्रिया अधिकृतरित्या दिली नव्हती.

केंद्रामध्ये एनडीए प्रणीत भाजप सरकार 2014 मध्ये सत्तेवर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. 2019 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आल्यावरही ते दुसऱ्यांदा सरकारमध्ये सहभागी होऊ शकत होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण ओळखून जेटली यांनी स्वत:हूनच स्वत:ला सक्रीय राजकारणापूस अलिप्त करुण घेतले. तसेच, पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून प्रकृतीअस्वास्थ्याचे कारण देत आपला समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करु नये अशी विनंतीही जेटली यांनी केली होती. त्यांच्या जाण्याने भाजपमध्ये तीव्र दु:ख व्यक्त केले जात आहे.