Farmers Protest: शेतकरी आंदोलनामुळे विमान चुकलेल्या प्रवाशांना Air India चा दिलासा; दुसरी फ्लाईट पकडता येणार 
Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

शेती कायदा मागे घ्यावा आणि किमान आधारभूत किंमत लागू करावी या मागणीसाठी भारतीय किसान युनियनने शुक्रवारपासून राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन (Farmers Protest) पुकारले आहे. शेतकर्‍यांच्या चळवळीमुळे दिल्ली (Delhi), हरियाणा आणि पंजाबमध्ये बर्‍याच ठिकाणी महामार्ग जाम आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनामुळे विमानतळावर पोहोचू न शकलेल्या प्रवाशांना एअर इंडियाने (Air India) दिलासा दिला आहे. गुरुवारी या आंदोलनामुळे ज्या लोकांना विमान पकडता आले नाही त्यांना आणखी एक फ्लाईट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा प्रवाशांना No-Show हटवण्याची परवानगी दिली गेली आहे. एखादा प्रवासी वेळेवर पोहोचू शकला नसेल तर रेकॉर्डमध्ये No-Show दिसतो.

एअर इंडियाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, आज विमानतळावर पोहोचल्यानंतर ज्या प्रवाशांना फ्लाईट घेता आली नाही, त्यांना दिलासा दिला जाईल. ही सवलत फक्त गुरुवारीसाठी आणि दिल्ली विमानतळावरील काही ठराविक विमानांसाठीच वैध असेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. एअर इंडिया व्यतिरिक्त, इंडिगोनेही वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे आज उशिरा आलेल्या प्रवाशांच्या भाडे परताव्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत सांगितले आहे. शेतकरी आंदोलनामुळे ज्या प्रवाशांना फ्लाईट पकडता आली नाही त्यांनी दुसरी फ्लाईट घेताना एअरलाइन्सला कळवणे गरजेचे आहे. (हेही वाचा: भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर 31 डिसेंबर पर्यंत उड्डाणावर निर्बंध कायम)

शेतकरी आंदोलन पाहता, दिल्ली प्रशासन सतर्क आहे आणि राजधानीची शांतता व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी अनेक उपयोजना राबवण्यात येत आहेत. दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमा सील केल्या असून तेथे मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, आज पानिपत येथे शेतकर्‍यांचा  थांबा असेल. शेतकर्‍यांची रणनीती फक्त एकच आहे, ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीला जायचे. आज पानिपत येथे थांबल्यानंतर पुन्हा सकाळी शेतकरी आंदोलन सुरू होईल. पानिपत, भारतीय किसान युनियनचे नेते सुरेश दहिया म्हणाले की लाठी चालू दे किंवा गोळ्या, शेतकरी थांबणार नाहीत.