Lockdown: रेड झोनमधील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवा- रामदास आठवले
Ramdas Athawale | (Photo Credits: Twitter)

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देशातील लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याची मागणी केली आहे. देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा वाढता आकडा पाहता देशातील लॉकडाऊन वाढविण्यात यावा असे आठवले यांनी म्हटले आहे. रामदास आठवले यांनी आयएनएस या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली या वेळी ते बोलत होते. लॉकडाऊन काळात जर खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता तर नागरिक, मजुरांनी पायी स्थलांतर केले नसते. असे असले तरी पायी जाण्याचा मजूरांचा निर्णय योग्य नसल्याचेही आठवले यांनी या वेळी म्हटले.

आठवले यांनी सांगितले की, ज्या ज्या ठिकाणी रेडझोन आहे त्या ठिकाणी लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवायला पाहिजे. असे करुनही जर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसेल तर लॉकडाऊन आणखी पुढे वाढवायला पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच, ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे अशा ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करायला हवेत असेही आठवले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 23 हजार पेक्षाही अधिक कोरोना रुग्णांची संख्या झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोरोना व्हायरसचे संकट निपटण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरल्याची टीका आठवले यांनी केली. तर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरही आठवले यांनी निशाणा साधला. या दोघांनाही चांगल्या गोष्टीतही विरोध करण्याची सवय असल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: धारावीत आज 46 नव्या कोरोना रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू)

आयएएनएस ट्विट

लॉकडाऊनच्या प्रश्नावर बोलताना आठवले म्हणाले की, पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी जर लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसतात तर, देशात कोरोनाचे शेकडो रुग्ण दिसले असते. तसेच, देशात कोरोनामुळ मृत्यू होणाऱ्यांची संख्याही प्रचंड वाढली असती. अमेरिकेने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय तत्परतेने घेतल नाही. परिणामी तिथे मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारची कोणतीही योजना नव्हती, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. ही टीका निराधार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.