निवडणुकीच्या तोंडावर भाजप खासदार Ravi Kishan सापडले वादाच्या भोवऱ्यात; महिलेने केला दुसरी पत्नी असल्याचा दावा, आपल्या 25 वर्षांच्या मुलीला स्वीकारण्याची मागणी
रवी किशन (फोटो सौजन्य-Twitter)

लोकसभा निवडणुकीपूर्वी गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन (BJP MP Ravi Kishan) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने रवी किशन यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. अपर्णाने स्वतःला भाजप नेते रवी किशन यांची दुसरी पत्नी असल्याचे सांगितले आहे आणि असेही म्हटले आहे की, रवी किशन आपली मुलगी स्वीकारण्यास नकार देत आहेत. यासंदर्भात अपर्णा ठाकूर यांनी लखनऊमध्ये आपल्या मुलीसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, रवी किशन यांनी आपली मुलगी शेनोव्हाला स्वीकारले नाही तर त्या कोर्टात जातील.

या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री योगी यांचीही भेट घ्यायची असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या मुलीला तिचा हक्क मिळावा अशी अर्पणा यांची मागणी आहे. अपर्णाच्या म्हणण्यानुसार, 1996 मध्ये त्यांचे रवी किशनसोबत लग्न झाले होते.

खासदार रवी किशन यांचे 1993 मध्ये लग्न झाले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव प्रीती शुक्ला आहे. आता आज अपर्णा ठाकूर आणि त्यांची मुलगी शेनोवा या दोघींनी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतली जिथे त्यांनी भाजप खासदार रवी किशन यांच्यावर गंभीर आरोप केले. आज अपर्णा ठाकूर म्हणाल्या, ‘रवी किशनने त्यांचे मित्र आणि कुटुंबियांसमोर आपल्या भांगेत कुंकू भरले होते. त्याचे फोटोही माझ्याकडे आहेत.’

त्या पुढे म्हणतात, ‘माझा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. गेल्या एक वर्षापासून रवी किशन माझ्या संपर्कात नाहीत आणि गेल्या 4 वर्षांपासून त्यांची मुलगी शेनोवा हिच्याही संपर्कात नाहीत. त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली ही त्यांची निवड आहे आणि हे माझे आणि माझ्या मुलीचे शेनोवाचे जीवन आहे. माझी इच्छा आहे की, त्यांनी आपल्या पहिल्या लग्नापासून असलेल्या मुलांसाठी जे काही केले, तेच शेनोवासाठीही केले पाहिजे.’ (हेही वाचा: Loksabha Election 2024: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती)

यावेळी रवी किशन यांच्या कथित मुलीनेही तिचे वक्तव्य दिले. टी म्हणाली, ‘मी 15 वर्षांची असताना मला कळले की रवी किशन माझे वडील आहेत. माझ्या वाढदिवसाला आणि इतर फंक्शनला ते आमच्या घरी यायचे मात्र त्यावेळी मी त्यांना काका म्हणायचे. ते मला पूर्वी भेटत असत, मात्र आता त्यांच्याशी गेले 4 वर्षे काहीही बोलणे झाले नाही.’