Agra Mughal Museum Name Change: आग्रा येथील संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव, उत्तर प्रदेशचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा
Yogi Adityanath | (Photo Credits: Facebook)

आग्रा (Agra) येथे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाला 'छत्रपती शिवाजी महाराज '(Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे नाव देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी ही घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये छत्रपती 'शिवाजी महाराज हेच आपल्या सर्वांचे नायक' असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आगरा येथे उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखण्यात येईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशमध्ये गुलामीची मानसिकता दाखवणाऱ्या कोणत्याही प्रतिकांना कोणतेही स्थान असणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे नायक आहेत. जय हिंद, जय भारत.' ताजमहाल या जगप्रसिद्ध वास्तूच्या पूर्वेला असलेल्या द्वाराजवळ हे संग्रहालय उभारण्यात येत आहे.

राष्ट्रीय राजधानी पासून 120 किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असलेली जगप्रसिद्ध वास्तू ताजमहाल नजिक येथे एक संग्रहालय उभारले जात आहे. साधारण 6 एकर जागेवर हे संग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयात मुघल संस्कृती, कलाकृती चित्रे, भओजन, वेशभूषा आणि मुघल काळातील शस्त्र, दारुगोळा आदी वस्तूंचे संग्रहालय असल्याचे समजते. (हेही वाचा, Telangana: हैद्राबाद येथे नवीन सचिवालयात बांधले जाणार मंदिर, मशिदी आणि चर्च; KCR म्हणाले- गंगा-जमुना तहजीब यांचे असेल प्रतीक)

उत्तर प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या समाजवादी पक्षाचे असल्यापासून हे संग्रहालय उभारले जात आहे. 2015 मध्ये हे संग्रहालय बांधण्यास मंजूरी देण्यात आली. अद्यापही या संग्रहालयाचे बांधकाम सुरु आहे. तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने या संग्रहालयाला मुघल संग्रहालय (Agra Mughal Museum) असे नाव दिले होते. मात्र, आता हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या आधीही योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत. जसे की अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज केले आहे.

दरम्यान, 1526-1540 आणि 1555-1857 या काळात मुघल राजाने भारतावर राज्य केले. या राजानेच आगरा येथील ताजमहल आणि दिल्ली येथील लाल किला बांधला आहे. या वास्तुंच्या उभारणीचे श्रेय मुघल राजाला दिले जाते. इतिहासकार सांगतात की मुघल राजाने आपल्या तीन शतकांच्या राजवटीत हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले.