बदल्या तर होणारच! कर्तबगारी, राज्याची गरज पाहून अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या; सामना अग्रलेखातून विरोधकांचा समाचार
महाविकास आघाडी सरकारने गेल्या महिन्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. विरोधी पक्षाने अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. त्यानंतर आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांना उत्तर दिलं आहे. या अग्रलेखात शिवसेनेने अधिकाऱ्यांच्या बदलीमागची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, 'गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत हे स्पष्ट दिसते. कोणत्याही कुरबुरी न होता हे बदल झाले हे महत्त्वाचे. बाकी विरोधक काय बोलतात आणि टीका करतात याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. मर्जीतले अधिकारी त्यांनी त्यांच्या काळात नेमले. आता कर्तबगारी, राज्याची गरज पाहून नेमणुका झाल्या. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी सरकाराचा व्यवहार जनतेच्या सुरक्षेशी असतो. त्याबाबत व्यवहार चोख झाला आहे असे सांगता यावे अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.'